Menu

अपराध समाचार
Nashik Crime: नाशिकच्या कारागृहात खळबळजनक घटना! कैद्याने कारागृहातच संपवलं जीवन; नेमकं काय घडलं?

nobanner

नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central jail) शिक्षा भोगत असलेल्या एका बंदीवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 26 ऑक्टोबर) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. शिवदास भालेराव (वय 58, कैदी क्रमांक यूटी-802) असे मृत्युमुखी पडलेल्या बंदीवानाचे नाव आहे.

सिन्नर तालुक्यातील रहिवासी असलेले भालेराव याला एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (बलात्कार) केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती आणि जून 2024 पासून तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता.

Nashik Crime: कारागृहातच घेतला गळफास
रविवारी दुपारच्या सुमारास भालेराव याने कारागृहातील एका ठिकाणी कशाच्या तरी साहाय्याने गळफास घेतल्याचे कारागृह प्रशासनाच्या लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच कारागृहातील पोलीस अंमलदारांनी तातडीने त्यांना खाली उतरवून शासकीय जिल्हा रुग्णालयात सव्वा तीनच्या सुमारास दाखल केले. मात्र, तेव्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून कैद्याला मृत घोषित केले.

Nashik Police: पोलिसांकडून पुढील तपास
या घटनेची नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आणि कारागृह प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात एकच खळबळ उडाली आहे.

Nashik Road Jail: कारागृहातील ‘त्या’ व्हायरल व्हिडीओ प्रकरणात गुन्हा दाखल
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहातील काही कैदी सुरक्षेचा फज्जा उडवत अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये मातीच्या चिलीमचा वापर करत अमली पदार्थ ओढताना दिसणारे दृश्य, तसेच कैद्यांकडून मोबाईल फोनवर शूट केलेल्या रील्स व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकाराची दखल घेत नाशिकरोड पोलिसांनी 5 ते 6 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासात हे व्हिडीओ मागील वर्षीचे असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, इतक्या गंभीर प्रकारानंतरही कारागृह प्रशासनाकडून वर्षभरात कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, हे विशेष लक्ष वेधणारे ठरले होते. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.