देश
वस्तूंवरचा ‘एमआरपीचा टॅग’ लवकरच हद्दपार?
भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या वस्तुंची किंमत दर्शवणाऱ्या ‘एमआरपी टॅग’ची संकल्पना लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेतील बदलत्या निकषांचा अवलंब करण्यासाठी भारताकडून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याची माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने ‘मनी कंट्रोल’ या संकेतस्थळाला दिली.
भारतातील रिटेल क्षेत्रात दाखल होणाऱ्या परदेशी ब्रॅण्ड आणि समुहांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परदेशी गुंतवणूकदारांना भारताकडे आकर्षित करण्याच्यादृष्टीने या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या रिटेलर्सच्या म्हणण्यानुसार प्रत्येक गोष्टीवर एमआरपी टॅग लावणे, ही काहीशी त्रासदायक गोष्ट आहे. त्यामुळे आता विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या सर्वच दैनंदिन वस्तूंवरील एमआरपी टॅग काढून टाकण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो. भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी अनेक सिंगल ब्रँड रिटेलर्स उत्सुक आहेत. मात्र, भारतीय बाजारपेठेतील प्रचलित व्यवस्थेनुसार प्रत्येक वस्तूवर किंमतीचा टॅग लावणे ही त्रासदायक गोष्ट आहे. अनेक देशांमध्ये प्रत्येक वस्तूवर किंमत नमूद न करता ज्या ठिकाणी वस्तू विक्रीला ठेवण्यात येतात त्या रॅकवर एमआरपी टॅग असतो. मात्र, भारतात ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या नियमांनुसार प्रत्येक वस्तूवर किंमत नमूद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सरकारने आता एमआरपी टॅग काढण्याचा निर्णय घेतला तरी त्यासाठी मोठ्या कायदेशीर सुधारणांच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक नव्या उपाययोजना जाहीर केल्या होत्या. मात्र, एमआरपी टॅगची संकल्पना हद्दपार झाल्यास भारत जागतिक बाजारपेठेच्या निकष पूर्ण करण्यात यशस्वी ठरेल. त्यामुळे भारतातील परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढेल, असा कयास आहे.