मनोरंजन
‘कटप्पा-बाहुबलीचं कोडं सुटलं, पण मुंबईकर ट्रफिकचे नियम का पाळत नाही?’
मुंबईकरांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ‘बाहुबली-2’च्या फिव्हरचा फायदा घेत मुंबई पोलिसांनी ट्वीटरवर दोन सवाल उपस्थित केले आहेत.
बाहुबली सिनेमाच्या पहिल्या भागात ‘कट्टाप्पानं बाहुबलीला का मारलं?’ या प्रश्नानं अनेकांना डोकं खाजवायला लावलं होतं. सोशल मीडियातही या प्रश्नानं अनेक मेसेज व्हायरल होत होते. त्याचं उत्तर सिनेमाच्या दुसऱ्या भागात देण्यात आलं आहे. हे जाणून घेण्यासाठी सिनेरसिकांनीही चित्रपट गृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे.
याचाच वापर करुन मुंबई पोलिसांनी वाहतुकीच्या समस्यांबाबत जनजागृती मोहीम सुरु केली आहे. मुंबई पोलिसांनी यासाठी ट्वीट केले असून, या ट्वीटमध्ये ‘कटप्पानं बाहुबलीला का मारलं?’ असा सवाल विचारला आहे.
तसेच ‘मुंबईकर नागरिक ट्रॅफिक नियमांचं पालन का करत नाहीत?’ असा दुसरा सवाल मुंबईकरांना विचारण्यात आला आहे. बाहुबलीचा हॅशटॅग वापरुन केलेलं हे ट्वीट काही तासातच चांगलंच व्हायरल झालं आहे.
दरम्यान, बाहुबली-2 ला सिनेरसिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा रिलीज होऊन दोनच दिवस झाले आहेत. पण या सिनेमाने गेल्या दोन दिवसात छप्परफाड कमाई केली आहे. फिल्म अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहिती नुसार, ‘बाहुबली 2’ सिनेमाने जगभरात पहिल्याच दिवशी 201 कोटींचा गल्ला जमवला आहे.