राजनीति
विधानसभेतील ‘त्या’ 9 आमदारांचं निलंबन मागे
विधानसभेतील 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री गिरिश बापट यांनी ही माहिती दिली आहे. गिरिश बापट यांनी 9 आमदारांचं निलंबन मागे घेण्यात यावं असा प्रस्ताव सभापतींसमोर ठेवला होता. तो संमत झाल्यानं आमदारांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे.
विधानसभेतील 19 आमदारांचं निलंबन झाल्यापासून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे 19 पैकी 9 आमदारांचं निलंबन तात्काळ रद्द करावं असा प्रस्ताव आज संसदीय कामकाज मंत्री गिरिश बापट यांनी सभापतींसमोर ठेवला होता.
अर्थसंकल्पादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं 22 मार्चला 9 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं होतं. यामध्ये काँग्रेसच्या 9 आणि राष्ट्रवादीच्या 10 आमदारांचा समावेश होता.
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, काँग्रेसचे अब्दुल्ल सत्तार यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश होता. या सर्वांचं 31 डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात यावं, असा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिला. तो मान्य करण्यात आला होता.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 18 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता.
सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवून या आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं.