देश
मुख्यमंत्र्यांनी जयाजी सूर्यवंशींच्या कानात काय सांगितलं?
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली असली, तर शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं चित्र आहे. पुणताब्यांतील कोअर कमिटीच्या शेतकऱ्यांमधील मतभेद उघड झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी 100 टक्के मागण्या मान्य न केल्यानं आज पुणतांब्यात शेतकऱ्यांनी कोअर कमिटीच्या विरोधात निदर्शनं केली.
त्यातच किसान क्रांतीचे नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. जयाजी सूर्यवंशी यांना सरकारने ‘मॅनेज’ केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
याबाबत एबीपी माझाने जयाजी सूर्यवंशी यांच्यांशी संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेतली.
मी कुणाचाही गुलाम नाही
जयाजी सूर्यवंशी म्हणाले, ” माझे कोणाशीही लागेबांधे नाहीत,मी कुणाचाही गुलाम नाही, शेतकऱ्यांसाठी माझं काम आहे. आम्ही 4 महिन्यांसाठी संप स्थगित केलाय, जर मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर पुन्हा संप करु”
नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम
इतकंच नाही तर देशभरातील शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे. त्यासाठीही किसान क्रांती देशभरात आंदोलन करेल, असंही त्यांनी नमूद केलं.
याशिवाय कालच्या बैठकीत जे काही घडलं त्याबाबतचं मुख्यमंत्री कार्यालयाचं पत्र घेण्यासाठी मी सदाभाऊ खोत यांच्या बंगल्यावर गेलो होतो, असं स्पष्टीकरणही सूर्यवंशी यांनी दिलं.
मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा
“मुख्यमंत्र्यांनी आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या. राज्यातील बहुतेक शेतकरी हे अल्पभूधारक आहेत, त्यांची कर्जमाफी करण्यास सरकार राजी झालं आहे. याशिवाय शेतमालाला हमीभाव, दुधाला दर देण्यासाठी कृषी आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांबाबत वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा झाली, ही सर्व चर्चा सकारात्मक झाली”, असं जयाजी सूर्यवंशी म्हणाले.
मात्र असं असलं, तरी नाशिक आणि पुणतांब्यातील शेतकरी अजूनही संपावर ठाम आहेत, याबाबतही त्यांना विचारण्यात आलं.
पुणतांब्यात दोन गट
त्याबाबत जयाजी सूर्यवंशी म्हणाले, “शेतकरी संपाबाबत 21 जणांची समिती आणि 6 जणांची कोअर कमिटी तयार करण्यात आली. या कोअर कमिटीत 2 जण नाशिकमधील आहेत. त्यांच्याही चर्चा झाली आहे. मात्र पुणतांब्यात स्थानिक राजकारण मध्ये येत आहे. स्थानिक राजकारणामुळेच दोन भाग पडले आहेत”.
मुख्यमंत्र्यांनी कानात काय सांगितलं?
संप मिटल्यानंतर शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची घोषणा केली.
मात्र यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जयाजी सूर्यवंशी यांच्या कानात काहीतरी सांगितलं. त्याबाबत विचारलं असता, जयाजी सूर्यवंशी म्हणाले, “तुम्ही कसे आलात आणि कसे जाणार असं मुख्यमंत्र्यांनी विचारलं. त्यावर मी त्यांना सांगितलं, आम्ही कशाने आलो नाही, जायचं पाहून घेऊ. इतकंच बोलणं झालं आणि ते कॅमेऱ्याने टिपलं.”
माझा आणि मुख्यमंत्र्याचा काहीही संबंध नाही, मी कधीही त्यांच्या कार्यलयात गेलो नाही. सदाभाऊ खोत आणि आमचे चळवळीतले संबंध आहेत. शरद जोशींच्या जळवळीत आम्ही काम केलंय. त्यांच्या छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं भलं होत असेल, तर त्यांचं सहकार्य निश्चित घेऊ, असं जयाजी सूर्यवंशी म्हणाले.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.