Menu

देश
1993 मुंबई बॉम्बस्फोट निकाल: सात आरोपींचा आज फैसला!

nobanner

मुंबईतील 1993 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील शेवटच्या खटल्यातील आरोपी दोषी आहेत की नाही, याबाबत विशेष टाडा न्यायालय आज (शुक्रवार) निकाल देणार आहे.

या आरोपींमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूम यांचा समावेश आहे. या सर्वांवर आरोप निश्चित केले असून ते दोषी आहेत की नाही, हे विशेष टाडा न्यायालय स्पष्ट करणार आहे.

या सुनावणीसाठी अबू सालेम संपूर्ण टक्कल करुन आणि काळे कपडे घालून कोर्टात आला. तर निकालाचं टेन्शन असल्याची प्रतिक्रिया मुस्तफा डोसाने एबीपी माझाकडे व्यक्त केली.

साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. तर तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.

12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडले होते. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली.