देश
अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा बदला, सर्व दहशतवाद्यांचा खात्मा
भारतीय सैन्याने आणि काश्मीर पोलिसांनी अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा अखेर बदला घेतला आहे. अमरनाथ यात्रेवर हल्ला करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची माहिती जम्मू काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी दिली आहे. यात्रेवर हल्ला करणारे टॉपचे तिन्ही अतिरेकी ठार झाल्याचं ट्वीट शेष पॉल वेद यांनी केलं आहे.
सूत्रधार अबू इस्माईलच्या खात्म्यानंतर अमरनाथ यात्रेवर हल्ला करणारे अबू माविया, फुरकान आणि यावर यांना कंठस्नान घातलं, असं ट्वीट वेद यांनी केलं आहे.
चकमकीत अतिरेक्यांचा खात्मा
सोमवारी श्रीनगर-जम्मू हायवेवर पोलिस आणि सुरक्षा दलासोबतच्या चकमकीत या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीत एक भारतीय जवानही शहीद झाला आहे.
अबू मौविया, फुरकान हे लष्कर ए तोयबाचे अतिरेकी होते. तर यावर हा स्थानिक संघटना हबलिश काझीगंधचा दहशतवादी होता.
दहशतवादी हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू
10 जुलै रोजी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेच्या बसवर झालेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सहा महिलांचा समावेश होता. तर 19 जण जखमी झाले होते. लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला होता.
मृतांमध्ये महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. तर इतर भाविक गुजरातमधील वलसाडचे आहेत.
रात्री सव्वा आठच्या सुमारास बालटाल इथून जम्मूच्या दिशेने जाणाऱ्या अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यात्रेकरूंनी बस थांबवल्याने ही बस सुरक्षारक्षकांच्या ताफ्यातून मागे राहिली. हीच संधी साधत दहशतवाद्यांनी हल्ला केला.