देश
तीन हत्यांनी नाशिक हादरलं, दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
काल एकाच दिवशी तीन हत्यांनी अवघा नाशिक जिल्हा हादरला. यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिकच्या पोलिस आयुक्तांनी या बदल्यांचे आदेश दिले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुलदास भोये आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार चौधरी या दोघांची उचलबांगडी करण्यात आली. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल (28 डिसेंबर) दोन हत्या झाल्या, तर तिसरी हत्या दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली.
काय आहे प्रकरण?
काल (28 डिसेंबर) एकाच दिवशी तीन हत्यांच्या घटनांनी नाशिक हादरलं. नाशिकच्या सिडको परिसरात एक आणि इंदिरानगर परिसरात दोन हत्या झाल्याचं समोर आलं. या घटनेनंतर नाशिककरांमध्ये घबराट पसरली असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बुधवारी रात्री नऊच्या सुमारास सिडको परिसरातील डीजीपी नगरमध्ये साहेबराव जाधव नावाच्या रिक्षाचालकाची हत्या झाली. चार ते पाच जणांच्या टोळक्याने साहेबराव जाधवच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात साहेबराव जाधवचा मृत्यू झाला तर हल्लेखोर पसार झाले.
ही घटना होऊन काही तास उलटत नाही, तोच नाशिकच्या इंदिरानगर परिसरात अशाचप्रकारे धारदार शस्त्राने वार करत दोघांची निर्घृणपणे हत्या केली आणि हल्लेखोर फरार झाले. पूर्ववैमनस्यातून या हत्या झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
एकाच रात्री काही तासांच्या अंतराने साहेबराव जाधव, देवा इंगे आणि दिनेश बिराजदार या तीन जणांची हत्या झाली. ही बातमी समजताच नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.