देश
गोव्याच्या कळंगुट बीचवर अकोल्याचे पाच जण बुडाले
गोव्यातील कळंगुट बीचवर पोहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. हे सर्वजण अकोल्यातील विठ्ठलनगरमधल्या मोठी उंब्रीचे रहिवासी होते. तिघांचे मृतदेह हाती लागले असून दोघांचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये दोन भावांचा समावेश असून त्यापैकी एक जण पोलीस शिपाई आहे. हवामान विभागाने पाण्यात न उतरण्याचा इशारा दिला असतानाही तरुणांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांच्या जीवावर बेतलं.
अकोल्याहून एकूण १४ मित्रांचा ग्रुप कळंगुट बीचवर आला होता. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हे सगळे मित्र बीचवर पोहोचले होते. बीचवर पोहोचताच समुद्रात उतरण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने पाच जण समुद्रात बुडू लागले. त्यापैकी तिघांचे मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर सापडले असून दोघांचा शोध सुरु आहे. बाकीचे नऊजण सुखरुप आहेत.
मृतांची नावे प्रीतेश गवळी, चेतन गवळी, उज्वल वाकोडे अशी आहेत. तर किरण म्हस्के आणि शुभम वैद्य हे दोघे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.