Menu

दुनिया
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडून शोक व्यक्त; राष्ट्रपती, पंतप्रधानांना लिहीले पत्र

nobanner

मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरात केरळमध्ये प्रचंड हाहाकार उडाला होता. या महाप्रलयाची दखल इतर देशांकडूनही घेतली गेली आहे. या महापूरात मृत्यू पावलेल्या नागरिकांप्रती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शोक भावना व्यक्त केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नुकतीच, युएई देशाकडूनही केरळच्या पूरग्रस्तांसाठी ७०० कोटी रुपयांची मोठी मदत देण्यात आली आहे.

केरळमध्ये ८ ऑगस्टपासून झालेल्या जोरदार पावसामुळे महापूर आला होता. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी या पुरात २२३ जणांचे प्राण गेले आहेत. तर सुमारे १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी न्यावे लागले. या पुरात जवळपास २० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. याशिवाय केरळमधील पर्यटन व्यवसायालाही याचा फटका बसला असून जवळपास ८० टक्के पर्यटकांनी केरळमधील बुकिंग रद्द केले आहे.

दरम्यान, अबुधाबीमध्ये राहणाऱ्या मल्याळी व्यावसायिकानं तब्बल ५० कोटींची मदत करणार असल्याचं जाहीर केलं आहे. महाराष्ट्र सरकारनेही केरळला तातडीची २० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. पुण्यातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी ट्रेनने पाठवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच आंध्र प्रदेशकडून १० कोटी, पंजाबकडून १० कोटी, दिल्ली सरकारकडून १० कोटी, तेलंगणाकडून २५ कोटी रुपयांच्यी मदत देण्यात आली आहे.

दुसरीकडे केरळ सरकारने ३० ऑगस्ट रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याची तयारी सुरु केली आहे. अधिवेशनात मदतकार्य, पुनर्वसन आणि पुनर्निमाण यावर चर्चा केली जाणार असून यासंदर्भातील शिफारस राज्यपालांना लवकरच केली जाईल, असे विजयन यांनी सांगितले. तसेच विजयन यांनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याचेही म्हटले आहे.