Menu

देश
हा पराभव पंतप्रधानांचाच, सामनातून डिवचले

nobanner

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच पराभव असल्याची भाजपाला झोंबणारी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. मोदी हे प्रचारात उतरले नसते तर हा पराभव स्थानिक नेतृत्वाचा व अंतर्गत तिकीट घोटाळ्याचा ठरला असता. पण पंतप्रधान सर्व फौजफाटा घेऊन उतरले. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ प्रचारात उतरवले, त्यामुळे हा पराभव पंतप्रधानांचाच आहे, अशी बोचरी टीका ‘गांधी का टिकले?; महाभारत’ या आजच्या सामनातील संपादकीयमधून करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विजय नम्रपणे स्वीकारला पण मोदी तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींचे देश उभारणीतील योगदान मानायलाही तयार नाहीत असंही यात म्हटलं आहे. पाहुयात नेमकं काय म्हटलंय सामनाच्या संपादकीयमध्ये –

गांधी का टिकले?; महाभारत –

श्री. राहुल गांधी यांनी विजय नम्रपणे स्वीकारला. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. मोदी तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींचे देश उभारणीतील योगदान मानायला तयार नाहीत. भाजप उभारणीतले लालकृष्ण आडवाणी व इतर कुणीच त्यांना मान्य नाहीत. असा अहंकार फक्त महाभारतात दिसला होता, पण त्याचाही पराभव झाला. श्री. राहुल गांधी यांनी नम्रतेने सांगितले, ‘आम्ही भाजपचा 2019 मध्येही पराभव करू, पण भाजपमुक्त हिंदुस्थानचा नारा देणार नाही.’ इतक्या वादळातही गांधी का टिकले व इतके घाव सोसूनही लोकशाही का नष्ट झाली नाही याचे उत्तर त्याच विनम्रतेत आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचंड विजय नम्रतेने स्वीकारला आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारून गांधी यांना एक वर्ष झाले व कालच्या या विजयाने काँग्रेसला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढले. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणे म्हणजे महात्मा गांधी यांचे काँग्रेस बरखास्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासारखेच आहे अशी टीका तेव्हा मोदी-शहांसारख्या दिग्गजांपासून ते भाजपातील गल्लीबोळातील पोरेटोरेही करीत होती. ‘काँग्रेसमुक्त हिंदुस्थान’चे नारे देऊन त्यांचे घसे कोरडे पडत होते व देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला रोज श्रद्धांजली वाहिली जात होती. या सगळ्यांना राहुल गांधी यांनी त्यांच्या घरात घुसून मारले आहे. काँग्रेसला जे श्रद्धांजली वाहताना थकत नव्हते ते सगळे अचानक मूकबधिर झाले आहेत. मोदी हे विष्णूचा तेरावा अवतार तर शहा हेच मूळ चाणक्य आहेत. त्यामुळे पुढची शे-पाचशे वर्षे या दोन शूरवीरांचा पराभव होणार नाही आणि हे दोन वीर पुनः पुन्हा अवतार घेत राहतील व राज्य करतील असे त्यांच्या भक्तांना वाटत होते. पण आमच्या देशात तेहतीस कोटी देव आहेत व देवही एकमेकांशी ‘सत्य धर्म’ यासाठी लढत होते हे भक्तगण विसरले. पाच राज्यांत जे महाभारत घडले त्यात पांडव कोण, कौरव कोण या फंदात आम्हाला पडायचे नाही, पण अन्याय आणि असत्याचा पराभव झाला. गर्वहरण झाले व अहंकारही मारला गेला. श्री. मोदी यांनी आता सांगितले की, ‘हार-जीत जीवनाचा भाग आहे. भाजप जनादेश नम्रतेने स्वीकारीत आहे. पराभवाबरोबर विजयही नम्रतेने स्वीकारणे हीच आमची संस्कृती आहे.’ पण 2014 नंतर ही

संस्कृती व विनम्रता देशातून नष्ट झाली. ज्यांनी पक्ष घडवला ते अडगळीत गेले. ज्या मित्राने संकटकाळात साथ दिली ते शत्रू ठरवले गेले. ज्या जनतेने तुम्हाला धुळीतून शिखरावर नेले त्याच जनतेचा कडेलोट झाला. हे राज्य व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांसाठी चालवले व आता ते पेंढाऱ्यांचे राज्य बनले. पाचपैकी एकाही राज्यात मोदी व शहा विजय मिळवू शकले नाहीत. कारण जनतेला व्यापारी नको आहेत. काँग्रेस राजवटीत काही गोष्टींचा अतिरेक झाला तेव्हा इंग्रज परवडले अशी तीव्र भावना लोकांत निर्माण झाली. आता काँग्रेस परवडली असे लोकांना वाटू लागले आहे. चार राज्यांतील पराभव हा मोदींचा पराभव नसल्याचे आता सांगितले जाते. चुकीचे तिकीट वाटप व स्थानिक नेतृत्वामुळे पराभव झाला अशी कारणेही पुढे केली जात आहेत. मग आतापर्यंत मिळालेले विजयांचे श्रेय स्थानिक नेत्यांना कितीदा दिले? प्रत्येक राज्यात मोदी व शहा यांनी चाळीस चाळीस सभा घेऊन काँग्रेस व राहुल गांधी यांना लाथा घातल्या. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने किती खालच्या पातळीवर जाऊन बोलावयाचे याचे भान ठेवले नाही. नोटाबंदीपासून ते 95 वर्षांच्या आईचा मुद्दा प्रचारात येतो व त्यावर भावनिक बोलून मते मागितली जातात. लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोदी हे प्रचारात उतरले नसते तर हा पराभव स्थानिक नेतृत्वाचा व अंतर्गत तिकीट घोटाळ्याचाच ठरला असता. पण पंतप्रधान सर्व फौजफाटा घेऊन उतरले. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ प्रचारात उतरवले, त्यामुळे हा पराभव पंतप्रधानांचाच आहे. त्यांनी तो आता विनम्रतेने स्वीकारला.

त्यातही अहंकार आहे. त्यांनी मोठ्या विजयाबद्दल राहुल गांधींचे अभिनंदन केले नाही. संसदेत राहुल गांधी यांनी मोदी यांना आलिंगन दिले तेव्हा ‘ही काय जबरदस्ती?’ असे गोंधळलेले भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. कोण राहुल गांधी? असे त्यांना वाटले. कोण गांधी, कोण बादल, कोण ठाकरे, कोण जनता? सर्वकाही मी आणि मीच आहे. त्या मीपणाचा पराभव शक्तिमान जनतेने केला. आता श्री. राहुल गांधी यांनी विजय नम्रपणे स्वीकारला. भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले. विकासात मावळत्या मुख्यमंत्र्यांचेही योगदान आहे व त्यांचे काम पुढे नेऊ असे जाहीर केले. मोदी तर पंडित नेहरू, इंदिरा गांधी व राजीव गांधींचे देश उभारणीतील योगदान मानायला तयार नाहीत. भाजप उभारणीतले लालकृष्ण आडवाणी व इतर कुणीच त्यांना मान्य नाहीत. असा अहंकार फक्त महाभारतात दिसला होता, पण त्याचाही पराभव झाला. श्री. राहुल गांधी यांनी नम्रतेने सांगितले, ‘आम्ही भाजपचा 2019 मध्येही पराभव करू, पण भाजपमुक्त हिंदुस्थानचा नारा देणार नाही.’ इतक्या वादळातही गांधी का टिकले व इतके घाव सोसूनही लोकशाही का नष्ट झाली नाही याचे उत्तर त्याच विनम्रतेत आहे. आम्ही काँग्रेसचे घोर विरोधक आहोत. गांधी घराण्यावर आम्हीही वेळोवेळी कठोर प्रहार केले आहेत. तरीही चांगल्याला चांगले म्हणावे ही विनम्रता आमच्यात आहे. थट्टा आणि अहंकाराचा अतिरेक होतो तेव्हा जनता नरसिंहाचा अवतार घेते. मतपेटीतून हा नरसिंह बाहेर येतो तसा तो पाच राज्यांत आला. धडा घ्यावा असे निकाल लागले, पण धडा घेण्याची इच्छा आहे काय?

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.