देश
भाजपाकडे ना अली आहेत ना बजरंगबली – मायावती
भारतीय जनता पार्टीला ना अलीची मतं मिळतील ना बजरंग बलीची असा दावा बसपाच्या अध्यक्ष मायावतींनी केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अली-बजरंगबली वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी योगींवर टीका केली आहे. बजरंगबली दलित समाजाचे होते, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले होते. हाच उल्लेख करत मायावती म्हणाल्या की मला व माझ्या पक्षाला बजरंगबली तितकेच महत्त्वाचे आहेत. “आमच्याकडे अली व बजरंगबली दोन्ही आहेत. बजरंगबली आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण ते दलित होते. मी नाही तर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी बजरंगबलींची जात सांगितली होती,” मायावती म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महागठबंधन म्हणजे महामिलावट असल्याची टीका केली होती. भारतानंतर जी झेप घेतली आहे ती स्वीकारता येत नसल्यानेच विरोधी पक्ष सरकारविरोधात असल्याचे मोदी म्हणाले होते. सध्या भारत जगात आपले स्थान निर्माण करत आहे. परंतु काँग्रेस, डीएमके व महामिलावटमध्ये असलेल्या मित्रांच्या हे पचनी पडत नसल्याचे मोदी म्हणाले होते. मोदींबरोबरच आदित्यनाथांनीही महागठबंधनविरोधात जोरदार टीका केली होती. मायावतींनी भाजपातील लक्ष्य करताना योगींच्या अली-बजरंगबलीचा संदर्भ देत भाजपाकडे ना अली आहेत ना बजरंगबली असा पलटवार केला आहे.
एवढंच नाही तर नमो-नमोचा गजर करणारे लोक आता सत्तेवरून पायउतार होणार आहेत आणि जय भीमचा गजर करणारे सत्तेवर बसणार आहेत. योगी आदित्यनाथांनी मला बजरंगबलीबाबत मोलाची माहिती दिली त्याबाबत मी त्यांचे आभार मानते असा खोचक टोलाही मायावतींनी लगावला आहे. भाजपाला ना अलीची मतं पडणार आहेत ना बजरंग बलीची मतं पडणार आहेत हे त्यांनी लक्षात असू द्यावं असंही मायावतींनी सुनावलं आहे.