देश
रस्ते अपघातात जीव गमावलेल्याच्या कुटुंबीयांना ९५ लाखांची भरपाई
अपघातात जीव गमावलेल्या कळव्यातील अभियंत्याच्या कुटुंबीयांना ९५ लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय शनिवारी ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात देण्यात आला. या प्रकरणी मृत अभियंत्याचे कुटुंब आणि विमा कंपनी यांच्यातील दाव्याचा समझोता लोकन्यायालयामध्ये झाला आणि त्यानंतर हा खटला निकाली काढला. याशिवाय या न्यायालयामध्ये विविध प्रकरणांतील दोन हजार खटले न्यायाधीशांनी निकाली काढले.
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या कंपनीमध्ये उपविभागीय अभियंता पदावर दादाहरी मच्छिन्द्र चंदनशिवे (४५) हे काम करीत होते. त्यांचा २०१५ मध्ये अपघातात मृत्यू झाला. २०१५ मध्ये ते पत्नी आणि मुलीसोबत कारने उस्मानाबाद येथून ठाण्याला येत होते. मुरबाड येथील टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी मोटार अपघात विमा प्राधिकरणाकडे भरपाईचा दावा दाखल केला होता.
शनिवारी आयोजित विशेष लोकन्यायालयामध्ये विविध प्रकरणांतील दोन हजार खटले निकाली काढले. त्यामध्ये दादाहरी चंदनशिवे यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी भरपाई देण्यासंबंधीच्या खटल्याचा समावेश होता. जिल्हा न्यायाधीश एन. आर. बोरकर आणि इफ्कोचे उपाध्यक्ष सनी भंडारी
आणि व्यवस्थापक प्रदीप मोहन यांच्यासह मोटार अपघात विमा प्राधिकरणाचे सदस्य आर. एन. रोकडे, जिल्हा न्यायाधीश एच. एम. पटवर्धन, न्या. डी. जी. मुरुमकर, जिल्हा न्यायविधि विभागाचे सचिव एम. आर. देशपांडे या वेळी उपस्थित होते. त्या वेळी दादाहरी यांच्या कुटुंबीयांना ९५ लाख रकमेचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.