देश
उरले फक्त ५ दिवस; ‘विक्रम’शी संपर्क होणार?
भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम ‘चांद्रयान-२’च्या विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी ‘इस्रो’च्या हाती आता केवळ ५ दिवसच उरले आहेत. ७ सप्टेंबरला चंद्रावर उतरत असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. यानंतर इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र यात यश मिळू शकलेले नाही. विक्रममध्ये चंद्रावर केवळ एकच दिवस (पृथ्वीवरील १४ दिवस) काम करण्याची क्षमता आहे.
चंद्रावर २० किंवा २१ सप्टेंबर या दिवशी रात्र होईल. म्हणजेच चंद्रावर सूर्य अस्ताला गेल्यानंतर विक्रम लँडरशी संपर्क साधण्याची भारताची आशाही मावळणार आहे. दरम्यानच्या काळात विक्रमशी संपर्क साधण्याच्या कामात नासाही इस्रोला मदत करणार आहे. नासाचे ऑर्बिटर मंगळवारी चंद्रावर जेथे विक्रम लँडर आहे, त्या जागेच्या वरून प्रवास करणार आहे. नासाचे ऑर्बिटर विक्रमच्या लँडिंग साइटचे फोटोही घेण्याची शक्यता आहे.
नासाच्या ऑर्बिटरने विक्रम लँडरचे फोटो पाठवल्यानंतर संपूर्ण स्थितीचे विश्लेषण करण्यात मदत मिळणार आहे, असे नासाच्या ऑर्बिटरचे प्रोजेक्ट शास्त्रज्ञ नोआह पेत्रो यांनी म्हटले आहे.