Menu

देश
पोलीस कोठडीत तरूणाचा मृत्यू ; मानव अधिकार आयोगामार्फत चौकशी करा

nobanner

वडाळा पोलीस कोठडीत मृत्युमुखी पडलेल्या विजयसिंग या तरुणाच्या मृत्यूची मानव अधिकार आयोगामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी गुरूवारी मानव अधिकार आयोगाकडे केली आहे.

विजयसिंग या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलीस अधिकारी आणि पोलीस कोठडीमध्ये मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील आमदार नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच, विजयसिंग या तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत असणारे पोलीस अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही नवाब मलिक यांनी यावेळी दिला.

आमदार नवाब मलिक यांनी आज मानव अधिकार आयोग कार्यालयात जाऊन, मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष एम. ए. सईद आणि अतिरिक्त सचिव व्ही. के. गौतम यांची भेट घेत निवेदन सादर केले.

या निवेदनात म्हटले की, वडाळा ट्रक टर्मिनल ठाण्यात विजयसिंग या तरुणाचा पोलीस कोठडीमध्ये झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला. मारहाणीनंतर त्याला उपचार करण्यासही टाळाटाळ करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्यामुळेच विजयसिंग याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी आणि विजयसिंग याच्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

मानव अधिकार आयोगाची भेट घेतल्यानंतर आणि राष्ट्रवादीमार्फत तक्रार दाखल केल्यानंतर मानव अधिकार आयोगाने १४ नोव्हेंबर २०१९ ही तारीख दिली आहे. या तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अॅड. आनंद काटे हे खटला लढवणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, बबन कनावजे, हिंदी भाषिक संघटनेचे सचिव पारसनाथ तिवारी, बाप्पा सावंत आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.