देश
Alia Bhatt : आलियानं केलेल्या ‘त्या’ तक्रारीची अखेर पोलिसांनी घेतली दखल
स्वत:च्या घरात एके दिवशी दुपारच्या वेळी निवांत बसलेलं असतानाच अभिनेत्री आलिया भट्टला काहीतरी जाणवलं आणि तिच्या लक्षात आलं की आपल्याकडे कुणीतरी पाहतंय. सतत आपल्यावर कुणाचीतरी नजर आहे, याची कुणकूण लागताच तिनं नजर वळवली आणि आपल्यावर फोटोग्राफर्स नजर ठेवून असल्याचं तिच्या लक्षात आलं. खासगी आयुष्यातील असे फोटो व्हायरल करणाऱ्या या मंडळींना तिनं धारेवर धरलं. आक्रोश केला आणि अखेर आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात उडी घेतली आहे.
हेसुद्धा वाचा : Alia Bhatt : ‘माझ्यावर सतत नजर ठेवली जातेय’ म्हणत आलियाचा संताप अनावर, असं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार मुंबई पोलिसांनी सदर प्रकरणानंतर आलिया भट्टशी संपर्क साधला आणि तिला यासंदर्भात रितसर तक्रार दाखल करण्यास सांगितलं. जिथं, एका छायाचित्रकारानं तिचे खासगीतील फोटो काढत ते ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्धही केले. अभिनेत्रीकडून पोलिसांना सहकार्य करण्यात आलं असून, आपली PR Team त्या पोर्टलच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आलियाच्या तळपायाची आग मस्तकात…
दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आलं. हा क्षण तिच्यासाठी अतिशय खास होता. या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच हा आनंद काही फार काळ टिकला नाही. कारण, पुढच्याच क्षणाला आलियाच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. कारण ठरलं होतं एका प्रतिष्ठित माध्यम समूहाच्या पोर्टलवरून शेअर करण्यात आलेला तिचा Private Photo.
आपण घरात असतानाही अशा पद्धतीनं नजर ठेवली जात असून, फोटोही टीपले जात आहेत हे पाहून तिचा संताप अनावर झाला. एकच आक्रोश करत तिनं हा मुद्दा उचलून धरला आणि इन्स्टा स्टोरीमध्ये तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या पोस्टमध्ये तिनं मुंबई पोलिसांनाही टॅग करत त्यांच्याकडे दाद मागितली.
एकिकडे छायाचित्रकारांनी सर्व मर्यादा ओलांडलेल्या असतानाच दुसरीकडे आलियासोबत घडलेला प्रकार अतिशय संतापजनक असल्याचं मत अनुष्का शर्मा, अर्जुन कपूर, शाहीन भट्ट आणि कला जगतातील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी मांडलं. एखादी सेलिब्रिटी जर तिच्या स्वत:च्या घरातच सुरक्षित नसेल तर जाहीर कार्यक्रमांमध्ये ती सुरक्षित असेल का? असा सवाल त्यानं केला.