Menu

देश
Uddhav Thackeray : विनोद तावडे तावडीत सापडले असतील तर आतापर्यंत सरकारं कशी पाडली अन् बनवली त्याचा हा पुरावा : उद्धव ठाकरे

nobanner

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. पैसे वाटतानाचा व्हिडीओ समोर आला असेल तर निवडणूक आयोगानं पाहायला हवा. कारण, पैसे वाटतानाचा व्हिडीओ असेल तर जादूचे पैसे कुठून आले, कुणाच्या खिशात पैसे जात होते, असा सवाल ठाकरेंनी केला. तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली. यांच्या बॅगेतले पैसे आणि यांचे दगड तपासणार कोण? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. मला असं वाटतं की निवडणूक आयोगानं यावर कठोर कारवाई करावी, अन्यथा आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

गुन्हा दाखल करुन आरोपी फरार झाला नाही पाहिजे. कदाचित हे त्यांच्यातील गँगवॉर असू शकते. नाशिकमध्ये पैसे वाटताना काही जण फरार झाले अशी ऐकीव माहिती आहे. निवडणूक आयोगानं निष्पक्षणपणे चौकशी केली पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आता पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा हा पुरावा आहे. ज्या जागरुकतेनं हे कपटकारस्थान घडलं असेल, ज्यांनी हे उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे. मला माहिती न मिळता जे बोललो ते खरं आहे. भाजपंतर्गत किंवा मिंधे यांचं देखील गँगवॉर असू शकेल, अशी शक्यता असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

भाजपचा वोट जिहाद समोर
महाराष्ट्रानं बघायला हवं, यांच्या योजना कशा फसव्या आहेत. बहिणींना 1500 रुपये आणि यांना थप्याच्या थप्या हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं पाहतोय. भाजप, मिंधे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का? पैसा बाटेंगे और जितेंगे असं काही आहे. संपूर्ण महाराष्ट्रानं हे पाहिलेलं आहे, उद्या राज्य निर्णय घेईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

विनोद तावडे यांना पीएचडी मिळायला हवी, काही दिवसांपूर्वी त्यांचं कौतुक होत होतं, काही राज्यात त्यांनी सरकार पाडलं, काही राज्यात त्यांनी भाजपचं सरकार आणलं, त्याचं गुपित काय ते समोर आलं आहे. भाजपचा हा नोट जिहाद आहे, बाटेंगे और जितेंगे असं काही तरी आहे. आता निवडणूक आयोग काय कारवाई करतोय, ते पाहणार आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सर्व पुरावे घेऊन कारवाई व्हावी अन्यथा महाराष्ट्र कारवाई करेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.

अनिल देशमुख यांच्यावर भ्याड हल्ला झाला, कुणी हल्ला केला याची काही माहिती मिळत नाही, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केला.