देश
‘आज नेपाळसाठी काळ दिवस कारण, लोकांच्या…’; रक्ताने माखलेला बूट दाखवत मनिषा कोईरालाची भावूक प्रतिक्रिया
नेपाळमध्ये सध्या जनरेशन झेटकडून सोशल मीडियावरील बंदीविरोधात हिंसक आंदोलन करण्यात आल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. नेपाळमध्ये फार मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. नेपाळचे पंतप्रधान ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारने फेसबुक, इंस्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. याच्या निषेधार्थ जनरेशन-झेडने म्हणजेच 18 ते 28 वयोगटातील तरुण रस्त्यावर उतरले. यानंतर, देशातील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाली आहे. मूळची नेपाळची असलेली बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोइरालाने एक भावनिक पोस्ट शेअर करत तिच्या देशात सुरु असलेल्या हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
मनिषाचं नेपाळ कनेक्शन
मनीषा कोईरालाचा जन्म 16 ऑगस्ट 1970 रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे झाला. अभिनेत्रीचे आजोबा विश्वेश्वर प्रसाद नेपाळचे पंतप्रधान होते आणि वडील प्रकाश कॅबिनेट मंत्री होते. 1989 मध्ये मनीषाने ‘फेरी भेटौला’ या नेपाळी चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर मनीषाने सुभाष घई यांच्या ‘सौदागर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यासोबतच मनीषा नेपाळमधील वेश्याव्यवसाय रोखण्यासाठी आणि नेपाळी मुलींची तस्करी रोखण्यासाठीही काम करत आहे. नेपाळमधील नैसर्गिक आपत्ती, नेपाळमधील महत्त्वाच्या विषयांवर ती अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करते.
अभिनेत्रीने काय म्हटलं?
अभिनेत्री मनीषा कोइरालाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर रक्ताने माखलेल्या बुटाचा सूचक फोटो शेअर केला आहे. देशाला हादरवून टाकणाऱ्या या संकटासंदर्भात कठोर शब्दांमध्ये आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. अभिनेत्रीने नेपाळी भाषेत, ‘आजचा दिवस नेपालसाठी काळा दिवस आहे. कारण आज लोकांच्या आवाजाला, भ्रष्टाचाराविरुद्धच्या रागाला आणि न्यायाच्या मागणीला गोळ्यांनी उत्तर दिले जात आहे,” अशी कॅप्शन दिली आहे.
सरकारचं नेमकं म्हणणं काय? वाद का तापलाय?
नेपाळच्या ओली सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप, ट्विटर (एक्स) यासह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. नेपाळच्या कंपनी कायद्याअंतर्गत या कंपन्यांनी देशात स्वतःची नोंदणी केलेली नसल्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान ओली यांच्या सरकारने याला राष्ट्रीय सुरक्षा आणि नियमनाचा विषय असल्याचं म्हटलं आहे. या बंदीविरोधात झालेल्या आंदोलनामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. आंदोलनानंतर सरकारने नरमाईची भूमिका घेतल्याचं चित्र दिसत आहे.