Headlines

समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत, आता घेण्यात आला मोठा निर्णय, 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत…

समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वी दरोडेखोरांनी एका कुटुंबाला लुबाडत तब्बल 18 लाखांचा ऐवज लंपास केला होता. मध्यरात्री रस्त्यावर लोखंडी धारदार वस्तू फेकत गाडीचे टायर पंक्चर केले होते. त्यानंतर कुटुंबीयांना धमकावत त्यांच्याकडील सोनं लुटले होते. या घटनेनंतर आता समृद्धी महामार्गाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर-मुंबई समृद्धी
महामार्गावर अत्याधुनिक ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ बसवण्यात येणार आहे. तसंच, या कामासाठी समृद्धी महामार्गावर आजपासून 7 सप्टेंबरपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. सिन्नर ते इगतपुरीपर्यंत टप्प्याटप्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर आयटीएमएस अंतर्गत सीसीटीव्ही बसविण्याकरिता गॅन्ट्री उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत सिन्नर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज दरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्याची परवानगी महामार्ग पोलिसांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत अर्थात एमएसआरडीसीला दिली आहे.

मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक कधी असेल बंद?

सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंज दरम्यान 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत मुंबई दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील.

भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटरचेंज दरम्यान 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत मुंबई दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील.

नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक कधी असेल बंद?

सिन्नर इंटरचेंज ते भरवीर इंटरचेंज दरम्यान 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत नागपूर दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील.

भरवीर इंटरचेंज ते इगतपुरी इंटस्चेंज दरम्यान 4 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते दुपारी 4 वाजेपर्यंत नागपूर दिशेने जाणारी वाहतूक बंद राहील.

समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणारे दरोडेखोर अद्याप मोकाटच

समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणारे दरोडेखोर अद्याप मोकाटच आहेत. तीन ते चार दिवस उलटून देखील दरोडेखोरांना पकडण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना अपयश आले आहे. रक्षाबंधनानिमित्त मुंबईकडे निघालेल्या कुटुंबाला 27 तारखेला रात्री महामार्गावर लुटण्यात आले होते. दरोडेखोरांनी कार अडवून लूट केली होती. कारचे टायर फोडून 10 ते 12 जणांनी कुटुंबाला घेरून त्यांच्याकडील मुद्देमाल चोरुन नेला होता.  तब्बल 25 तोळे सोने आणि हजारो रुपयांची रोकड दरोडेखोडांनी लंपास केला होता. या घटनेमुळं महामार्गावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *