Headlines

‘महाराष्ट्र बंद’ची हाक द्यायची का? आंदोलनादरम्यान अचानक कोणी विचारला हा प्रश्न? उडाली एकच खळबळ

नवी दिल्लीमधील जंतर-मंतर येथे सुरु असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हिंसक वळण मिळालं. दिल्ली पोलीस आणि आंदोलन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक विद्यार्थी तसेच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सरकारी मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं असून घडलेल्या प्रकारासंदर्भात सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलन समर्थक आणि आंदोलनाला विरोध करणाऱ्यांमध्ये जुंपलेली असतानाच या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र बंदची हाक द्यायची ही नाही याबद्दल थेट महाराष्ट्रातील जनतेला सवाल विचारण्यात आला आहे.

‘महाराष्ट्र बंद’ची हाक द्यायची का?

 

दडपशाहीच्या विरोधात ‘महाराष्ट्र बंद’ची हाक द्यायची का? असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरुन महाराष्ट्राच्या जनतेला विचारण्यात आला आहे. “शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला क्रूर हल्ला आणि लाठीचार्ज पाहता, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी ‘वंचित बहुजन आघाडी’ने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक द्यावी का? आम्हाला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे,” अशी पोस्ट वंचित बहुजन आघाडीच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये सदर सवाल हा वंचित बहुजन अघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा तसेच वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य समितीच्या सदस्या रेखाताई ठाकूर यांनी विचारल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

प्रतिक्रियांचा पाऊस

“हे फक्त प्रकाश आंबेडकरच करू शकतात,” असं एका महिलेनं कमेंट करुन म्हटलं आहे. तर अन्य एकाने, “महाराष्ट्र बंद झालाच पाहिजे. न्याय हक्कासाठी पावले आंबेडकरच उचलू शकतात. हे वंचित बहुजन आघाडीच करू शकते. आम्ही या निर्णयाला पाठिंबा देतोय सर,” असं कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे. “प्रकाश आंबेडकर साहेब तुमचा एक शब्द महाराष्ट्र बंद,” अशी कमेंटही एकाने केली आहे. त्याचप्रमाणे, “हा सर महाराष्ट्र बंद झालाच पाहिजे,” असं म्हटलं आहे.

सगळीकडेच या पोस्टची चर्चा

17 तासांपूर्वी करण्यात आलेल्या या पोस्टला जवळपास 8 हजार लोकांनी लाईक केलं आहे. या पोस्टवर दीड हजारांहून अधिक कमेंट्स आहेत. ही पोस्ट 250 हून अधिक लोकांनी शेअर केली असून बहुसंख्य फॉलोअर्सने यावर सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवरुन केवळ मतं जाणून घेण्यासाठी ही पोस्ट करण्यात आली असून कोणत्याही पद्धतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली नाही. मात्र सध्या ही पोस्ट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चांगलीच चर्चेत असल्याचं दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *