रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत रायगड जिल्ह्यात उभारल्या जात असलेल्या महत्त्वाकांक्षी दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरिया प्रकल्पाच्या विकासाला आणखी वेग मिळणार आहे. औद्योगिक क्षेत्राला मुंबई-गोवा महामार्गाशी जोडणाऱ्या मुख्य अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ 239.99 कोटींचे रस्ते बांधणार आहे. यामुळे सुमारे 38 हजार कोटींची गुंतवणूक, 1.14 लाख रोजगार निर्मितीची क्षमता असलेल्या औद्योगिक शहराच्या प्रत्यक्ष उभारणीला नवी चालना मिळणार आहे.
महाराष्ट्रातील दुसरा मोठा औद्योगिक प्रकल्प
फेब्रुवारी 2025 मध्ये राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरियाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरात प्रशासकीय प्रक्रिया, आराखडा मंजुरी आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनानंतर आता प्रत्यक्ष कामांना आणि एकंदर प्रकल्पाला वेग मिळत असल्याचे या नव्या निविदेवरून स्पष्ट होत आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा आणि माणगाव तालुक्यांतील नऊ गावांमध्ये सुमारे 6056 एकर क्षेत्रावर हा प्रकल्प विकसित होत आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिपनंतरचा हा दुसरा मोठा औद्योगिक नोड मानला जात आहे. महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड या विशेष उद्देश कंपनीमार्फत केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त सहभागातून प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे.
1402 कोटींची कामं पहिल्या टप्प्यात
मार्च 2026 मध्ये प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधांसाठी 1401.84 कोटींचा ईपीसी करार मंजूर करण्यात आला आहे. या कामांमध्ये रस्ते, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्था, ड्रेनेज, वीज वितरण आणि डिजिटल नेटवर्क उभारणीचा समावेश आहे. त्यानंतर आता 249 कोटींचा रस्ता प्रकल्प हा औद्योगिक शहराच्या अंतर्गत आणि बाह्य संपर्क व्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा मानला जात आहे.
तिन्ही वाहतूक साधनांच्या संगमावर
औद्योगिक शहरामुळे कोकणातील औद्योगिकीकरणाला नवी दिशा मिळणार आहे. एमआयडीसीने मागवलेल्या नव्या निविदेनुसार औद्योगिक क्षेत्रातील मुख्य अंतर्गत रस्ता आणि मुंबई-गोवा महामार्गावरील सर्क्युलर ओव्हरलिफ्ट यांना जोडणाऱ्या रस्त्याचे 240 कोटी खर्चुन बांधकाम करण्यात येणार आहे. याबाबतची निविदा प्रक्रिया गेल्या आठवड्यात सुरू केली आहे. भविष्यातील 2 उद्योग, वेअरहाऊस, लॉजिस्टिक पार्क आणि बंदराशी संबंधित मालवाहतूक यासाठी ही जोडणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दिघी बंदर, राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण 3 रेल्वे या तिन्ही वाहतूक साधनांच्या संगमावर उभ्या राहात असलेल्या या औद्योगिक शहरामुळे कोकणातील औद्योगिकीकरणाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
