Headlines

पुण्यात गोळीबार झाल्याने एकच खळबळ; आरोपी ऊसात पळून गेले, पोलिसांकडून शोध सुरु

पुण्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथे गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. चारचाकी वाहन पार्किंग करताना झालेल्या वादातून हा गोळीबार करण्यात आला. यातील 2 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य 2 आरोपी ऊसात पळून गेले आहेत. त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टीमधील काही तरुण आणि पाटसच्या तरुणांमध्ये भर दुपारी उन्हात वाद झाला, या हाणामारीत गावठी पिस्तूलमधून 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर अन्य काही आरोपी ऊसात पळून गेले असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रिकामी काडतुसे जप्त केली आहेत.

मिळत असलेल्या माहितीनुसार, पाटस येथील गडदरे कॉम्प्लेक्स समोर ही घटना घडली आहे. काष्टी येथील काही गुंड प्रवृत्तीचे तरुण गडदडे कॉम्प्लेक्स समोर आले होते. त्यांची पाटस येथील काही तरुणांशी शाब्दिक बाचाबाची झाली. पुढे हा वाद वाढत गेला, दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर दोन्ही गटातील काही तरुणांनी गावठी पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. यात 3 ते 4 राऊंड फायर झाल्याची माहिती समोर येत आहे.

गोळीबाराची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि पाटस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातुन झाला ? कोणत्या पिस्तूलमधून फायर करण्यात आला आणि यामध्ये कोण जखमी झाले आहे का? याबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. यवत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *