मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड व्हायला नव्हती पाहिजे. पण मिसिंग लिंकवर पावसाळ्यात पडलेले खड्डे आणि दरड कोसळण्याची दुर्घटना पाहता मिसिंग लिंकच्या (Missing Link) कामात तडजोड झाल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे, असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी विधानसभेत बोलताना, आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दोन पानी पत्रात 14 मुद्दे लिहून मिसिंग लिंक प्रकल्प का करु नये, हे सांगून या प्रकल्पाची फाईल बंद केल्याचे म्हटले होते. या आरोपाला पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘बीबीसी मराठी’शी बोलताना सविस्तर प्रत्युत्तर दिले. (Mumbai Pune Connecting Link)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिसिंग लिंकवर दरड कोसळण्यापाठी बदललेले निसर्गचक्र आणि अभुतपूर्व पावसाचे कारण सांगितले होते. यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अभूतपूर्व पाऊसाबाबत बोलायचे झाले तर 2005 साली मुंबईत काय झाले होते? हळूहळू मान्सूनचा पॅटर्न आणि हवामानची परिस्थिती बदलत आहे. त्याचा अभ्यास केला नसेल तर ते दुर्दैवी म्हणायला पाहिजे, अशी टिप्पणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी या मिसिंग लिंकबाबत त्यांच्यावर करण्याचा आलेला धोरण लकव्याचा आरोपही स्पष्टपणे फेटाळून लावला. त्यांनी म्हटले की, याबाबत लोकांसमोर वस्तुस्थिती येणे गरजेचे आहे. अशी चर्चा सुरु आहे की, मिसिंग लिंक प्रकल्प मी होऊ दिला नाही, तो मी बंद केला. पण मुळात मिसिंग लिंकची कल्पना ही आमचीच होती. मला हा प्रकल्प करायचा नसता तर मिसिंग लिंकची कल्पनाच का मांडली असती? मिसिंग लिंक प्रकल्प होऊ नये, असे मला वाटत नव्हते. 2013 च्या डिसेंबर महिन्यात मी या प्रकल्पाला स्थगिती दिली तेव्हा मी सांगितले होते की, या प्रकल्पाचे कॅलक्युलेशन पुन्हा करा, सेफ्टी चेक पुन्हा करा, आणखी अभ्यास करा, विंड टनल स्टडी करा. मिसिंग लिंकला धोका नाही, हे सांगा. तसेच त्यावेळी मला या प्रकल्पाची किंमत योग्य वाटत नव्हती. त्यामुळे मी या प्रकल्पाच्या किंमतीचे मूल्य नव्याने तपासण्यास सांगितले होते. त्यामुळे तेव्हा मिसिंग लिंक प्रकल्पाला माझी नकारघंटा नव्हती. मला हेच करायचं असतं तर या प्रकल्पाची कल्पना पुढे कशी आली असती आणि मी त्याला मंजुरीच का दिली असती, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
Mumbai Pune Connecting Link: पृथ्वीराज चव्हाणांनी मिसिंग लिंक प्रकल्पाला का स्थगिती दिली होती?
पृथ्वीराज चव्हाण यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाला 2013 साली स्थगिती देण्याचे कारण सांगितले. अशाप्रकारचा टनेल देशात कधीच बांधण्यात आला नव्हता. त्यामुळे चिंता वाटत होती. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत आहेत याची मला खात्री आहे. तसेच मिसिंग लिंकच्या स्ट्रक्चरल इंजिनिअर्सवरही माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी चांगलं काम केलं. पण डिझाईन झाल्यानंतर कंत्राट द्यावे लागते. ते देताना काय झालं, प्रकल्पाची किंमत 50 टक्क्यांनी वाढली, तिकडे काही भ्रष्टाचार झाला का? भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रात प्रकल्पांसाठी 40 टक्के कमिशनची प्रथा पडल्याची चर्चा होते. तसे असेल तर मिसिंग लिंकच्या कामात सिमेंट आणि वाळूबाबत काय भ्रष्टाचार झाला आहे, याची चौकशी अद्याप झालेली नाही. माझा मिसिंग प्रकल्पाला आणि त्याच्या डिझाईनला आक्षेप नाही. मात्र, या प्रकल्पाची किंमत इतकी का वाढली? कधीतरी आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही कॅगमार्फत याचं ऑडिट करु, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
